मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महायुतीमध्ये कोणताही मतभेद नसून ती पूर्णपणे एकसंध आहे, असे सांगत त्यांनी केवळ जागावाटपावर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे स्पष्ट केले. महायुती आधीपासूनच एकत्र असल्यामुळे स्वतंत्र घोषणा करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ठाकरे गटाच्या हालचालींवर टीका करताना फडणवीस यांनी उपरोधिक शैलीत भाष्य केले. ठाकरे बंधूंची तुलना थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी करत, “पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर त्यालाच युती म्हणावी लागेल,” असा टोमणा त्यांनी लगावला. फडणवीस म्हणाले की, ठाकरे गटाने युती जाहीर केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप जागावाटपाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याउलट महायुतीमध्ये जागावाटपाची प्रक्रिया सुरळीत सुरू असून, अंतिम निर्णय झाल्यानंतर सर्व माहिती जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मलिक प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, त्यामुळे त्यावर पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाही. फडणवीसांच्या या वक्तव्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

