बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदावर बसवण्याची हालचाल सुरू झाल्याची चर्चा आहे. आज दुपारी त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता असून, त्यानंतर संध्याकाळी शपथविधी होणार असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून वेगवेगळी मतं समोर येत आहेत. शरद पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत सूचक वक्तव्य होत असतानाच, अजित पवार गटाकडून मात्र अशी कोणतीही चर्चा झालेली नसल्याचा ठाम रोहित पवार दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर यांच्या एका ट्विटने मोठी चर्चा निर्माण केली आहे. बारामतीत आतापर्यंत सत्तेच्या पदावर बसणाऱ्या नेत्यांच्या अभिनंदनाचे भलेमोठे बॅनर झळकायचे, त्यावर अजित पवारांचा राजबिंडा फोटो आणि ‘उपमुख्यमंत्री’ किंवा ‘भावी मुख्यमंत्री’ असे उल्लेख असायचे, पण आज ती जागा श्रद्धांजलीच्या बॅनरने घेतली आहे, असा सूचक सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या शेवटच्या वाक्याला टोमण्याचा अर्थ लावला जात असून, तो नेमका कुणासाठी आहे, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत.
रोहित पवार यांनी आणखी एक भावनिक आवाहन करत अजित पवार यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ हा शब्द वापरू नये, अशी विनंती केली आहे. “अजितदादा आपल्या कामातून कायम आपल्यातच आहेत,” असं सांगत त्यांनी श्रद्धांजलीच्या बॅनरबाबतही भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर राजकीय हालचालींना आणखी वेग आला. त्यानंतर लगेचच पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.सुनेत्रा पवार सध्या मुंबईत असून, विधानभवनात आमदारांच्या बैठकीसाठी त्या दाखल झाल्या आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुढे नेमकं काय घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

